भूकमारीची झळ आणि अंशकालीन निदेशकांचे वास्तव
आज अंशकालीन निदेशकांची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे.
ना कोणती ठोस आशा दिसते, ना भविष्याचा स्पष्ट मार्ग. अनेक अंशकालीन निदेशकांचे संपूर्ण घर हे फक्त या मानधनावर चालते. पण आजच्या वाढत्या महागाईत या तुटपुंज्या मानधनावर संसार चालवणे जवळजवळ अशक्य झाले आहे.
घरातील लोक, नातेवाईक आणि समाज एवढेच समजतात की आपला मुलगा, पती किंवा वडील “शिक्षक” आहेत. समाज त्यांना “सर” म्हणून मान देतो. पण अंशकालीन निदेशक आणि सहाय्यक शिक्षक यांच्यातील मोठी आर्थिक दरी कुणालाच दिसत नाही.
काम जवळपास सारखेच, जबाबदाऱ्या सारख्याच… पण मानधनात मात्र दहापट फरक.
फक्त “सर” हा किताब आणि समाजातील थोडी इज्जत मिळाली म्हणून पोट भरत नाही.
जेव्हा स्वतःच्या घराचा खर्चही नीट भागत नाही, तेव्हा घरच्यांच्या इतर इच्छा-अपेक्षा पूर्ण कशा करायच्या?
आणि जर अचानक दवाखान्याची वेळ आली, तर तो माणूस पूर्णपणे खचून जातो.
उत्पन्न कमी आणि खर्च जास्त… त्यात ते मानधनही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे उधार घेऊन संसार चालवावा लागतो. मानधन हातात येण्यापूर्वीच त्यापेक्षा जास्त कर्ज झालेले असते.
ही वेदना विशेषतः त्या अंशकालीन निदेशकांची आहे, जे फक्त या मानधनावरच अवलंबून आहेत.
ज्यांच्याकडे दुसरे उत्पन्नाचे साधन आहे, त्यांना कदाचित ही झळ कमी बसत असेल. पण ज्यांचे वय वाढले आहे, आयुष्याचा मोठा भाग या सेवेत गेला आहे, त्यांनी आता या वयात काय करावे?
ते फक्त एका आशेवर जगत आहेत — आणि ती आशा अंशकालीन निदेशकांच्या नेतृत्वाकडून आहे.
ही फक्त एका व्यक्तीची अपेक्षा नाही, तर हजारो कुटुंबांच्या भविष्याची आशा आहे.
म्हणून सर्व नेत्यांना नम्र विनंती आहे की आपले मतभेद, अहंकार आणि गटबाजी बाजूला ठेवून एकत्र या.
कारण अंशकालीन निदेशकांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे आपापसातील मतभेद आणि एकीचा अभाव.
काही लोक फक्त स्वतःला हुशार दाखवण्यासाठी दोन बाजूंना हात ठेवतात, गट तयार करतात आणि वातावरणात संभ्रम निर्माण करतात. अशा लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे.
ज्यांचे पोट भरलेले आहे, ज्यांना या नोकरीची खरी गरज नाही, त्यांना या वेदनेची जाणीव होणार नाही.
आज गरज आहे ती “मी” ची नाही, तर “आपण” ची.
“मी एकटाच करून दाखवेन” यापेक्षा “आपण सर्व मिळून करून दाखवू” ही भावना निर्माण झाली पाहिजे.
रस्ता कोणाचाही असो, पण जो मार्ग लवकर न्याय मिळवून देईल, तो स्वीकारला पाहिजे.
लोक प्रयत्न करत नाहीत असे नाही… प्रयत्न सुरू आहेत. पण अपेक्षित निकाल मिळत नाही, आणि त्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे आपसातील विसंवाद.
> “नकाशांना तुम्ही मोजू नका, समाजात चालून पाहा…
काय उरलं आहे आणि काय हरवलं आहे, तेव्हा खरी जाणीव होईल.
आज अंशकालीन निदेशकांना फक्त आश्वासनांची नाही, तर ठोस निर्णयांची गरज आहे.
कारण त्यांच्या संघर्षामागे हजारो कुटुंबांचे अश्रू, स्वप्ने आणि भविष्य जोडलेले आहे.
✍️ रहमत खान सर
जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा
--------------------------------------------------------
---------------------------------------------------------



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या